शाहिस्तेखानाचा पराभव पोवाडा

 शाहिस्तेखानाचा पराभव (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर


नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान ॥


छाटुन बोटें दूर पळविला; । धन्य शिवाजी भूरमण ! ॥ध्रु०॥


चौक १


केला धुमाकूळ शिवरायानं संकट मोंगल-राज्याला ।


स्वातंत्र्याच्या मुळ्या भेदिती अभेद्य मोंगल-भिंतीला ! ॥


चिरे धडाधड पडूं लागले, बुरुज कोसळे धरणीला ! ।


शिवशक्तीच्या तोफेमधुनी सुटला भीषणसा गोळा ! ॥


शिवतेजाची वीज देतसे झटके औरंगजेबाला ! ।


कांहीं सुचेना, अन्न रुचेना, झोपहि ये ना नयनाला ! ॥


भगवा झेंडा फडफड फडके भूषण वार्‍याला झाला ।


फडफड करुनी गगनी बोले, ’धन्य शिवाजी अवतरला !’ ॥


दर्‍याखोर्‍यांतुन मैदानांतुन पाउल टाकी शिव जेव्हां ।


विजयश्रीचीं फुलें उमलती त्या त्या स्थानीं मग तेव्हां ॥


फिरंग फिरवी शिवबा इकडे, तिकडे मोंगल गडबडला ! ।


टाप घोडिची ऐकुनि तिकडे शाहा कासाविस झाला !! ॥


दर्प असा हा शिवशक्तीचा सहन होइना दिल्लीला ।


रात्र्म्दिन नच झोप कुणाला, काय करावें शिवबाला ! ॥


विचार ठरला, दूत निघाला आला दख्खन देशाला ।


बादशाहाचं पत्र दिलं मग त्यानं शाहिस्ताखानाला ! ॥


"चला, मरा, तुम्हि कांहि करा, पण धराच या शिवचोराला ।


सरा न मागें, घरा न जावें, चराचरा शिवचोर चिरा !" ॥


बादशहाचं पत्र असं हे वाचुन शास्ताखान जरा ।


मनीं चरकला, विषण्ण झाला क्षणिं कोमेजुन ही गेला ! ॥


शुभ्र लोंबत्या दाढीवरचा रंग लगोलग पालटला ! ।


हात मस्तकावरती ठेवुन करि तो घोर विचाराला ॥


"काम असे हें अवघड मोठें शिवा न सोपा धरण्याला ।


पिशाच्च चेटुक अनुकुल त्याला कसें धरुं सैतानाला !!" ॥


स्वारीचा पण निश्चय केला शूर शिपाई जमवीला ।


फौज घेउनी खान चालला शिवरायाला धरण्याला ॥


जातां जातां बेत ठरवला चाकण किल्ला घेण्याला ।


वेढा दिधला मग खानानं सत्वर, चाकण किल्ल्याला ॥


प्रकार पुढचा काय जाहला सांगिन पुढच्या चौकाला ।


धन्य शिवाजी रसिकजनांनो ! ऐका श्रीशिवकीर्तीला ॥१॥


चौक २


नरसाळा फिरंगोजी वर । होता किल्लेदार ।


मोठा बाणेदार । झाला तय्यार संग्रामाला ।


केले घनघोर लढाईला । अस्मानांत धुरळा सारा भरला ! ॥


आटोकाट झगडा त्यानं केला । किल्ला लढविला ।


उपाय पर थकला । खानानं केलं कैद त्याला ।


किल्ला खानाच्या हातीं गेला । नरसाळा धन्य धन्य झाला ! ॥


चाल


शाहिस्ताखान मग त्याला । काय बोलला सांगतों तुम्हांला ।


"र्‍हा आतां आमच्या चाकरीला । चढवीन मोठया हुद्याला ।


शिवा काय देणार तुला ? । शिवाजीचा नाश करण्याला खान हा आला ॥


शिवाजीचा नाश खास झाला । असं समज आज या वेळा ॥


कोल्ह्यानं सिंहाशीं झगडा कधीं काय केला ? ॥


शिवा चोर बंडखोर झाला । चल माझ्यासंग या वेळा ।


पकडुया बंडखोराला !!" । असं बोलला खान हो त्याला ।


फिरंगोजी लालेलाल झाला ! । फिरंगोजी बोलला खानाला ॥


चाल


"शिवाजीचा बंदा नोकर । नरसाळा अस्सा राहणार ! ॥


शिवाजीच्या पायावर शीर । ठेविन मी, तोच मज प्यार ॥


शिवराय माझा रे मोर । शिवराय चंद्राची कोर ॥


चाल


बडबडसी व्यर्थ या वेळा । जंवा पाहशी खाना !


तूं त्याला । तंवा दरदरेल घाम अंगाला ।


दांतखिळी बसेल तोंडाला । शिवराय सिंह रे झाला ।


लोळविले कैक भूमिला । करुं नको त्याच्या निंदेला ।


जाऊं नको त्याच्या वाटेला । माझ्यासारखे कैक रे वीर त्याच्या पदराला ॥


परतून जा जा माघारा । अन् सांग बादशाहाला ।


कीं शिवाजीला कैद करण्याला । गेलों होतों---आलो माघारा ! ।


जो करील कैद शिवाजीला । असा एवढा सार्‍या दुनियेंत कोण हि न झाला !!" ॥


चाल


ऐकुनी बोल वीराचे । खान मनीं गारेगार झाला !


पाहून स्वामिभक्तीला । खानाला संतोष झाला ! ।


खानानं सोडलं मग त्याला । अन् त्याचा मोठा गौरव केला ॥


चाल


शिवरायाकडं पाठवलं त्यानं मग त्याला ॥


चाल


चाकणचा किल्ला घेऊन । चालला जल्दीनं ।


मोठया ऐटीनं । पुण्यामंदि थेट खान आला ।


शिवाजीचा वाडा त्यानं घेतला । ऐका प्रकार काय झाला ॥२॥


चौक ३


शिवाजीच्या महालामधिं खान । राहिला येऊन ।


बंदोबस्तानं । जागजागीं ठेवलं शिपायाला ।


हुकुम मनाईचा हत्त्याराला । वेशीवर पहारा रोज बसला ! ॥


खानाच्या परवान्यावीन । फिरकेना कोण ।


पाखरुंहि लहान । एवढा त्यानं बंदोबस्त केला ।


धाक शिवाजीचा वाटे त्याला । रात्रींही झोंप न डोळ्यांला ! ॥


सिंहाच्या गुहेमधिं जसा । ससा कसाबसा ।


शिरावा तसा । शिरला पुण्यामंदि खान ते वेळा ।


मगराच्या दाढेला हात । हात लावला त्यानं निभ्रांत ।


निभ्रांत जाहला भ्रांत । झाला काय वात ।


कळेना मजला ! ॥ शिवराय होता सिंहगडीं ।


घेउन सवंगडी । विचार घडोघडी । घडविती किल्ल्यावरती ते वेळा ॥


शाहिस्ता आला चालून । पुण्यामंदि राहिला येऊन ।


काढावा कसा हुसकून । विचार जोरानं असला हा झाला ॥


पाठवला एक ब्राह्मण । शिवरायाने । पुण्यामंदि त्यानं ।


जाऊन वश केलं एका मराठयाला ॥ एक खोटया लग्नाचा घाट ।


घाट घातला बीनबोभाट । वरातीचा रात्रीला थाट ।


कैला ऐटींत । लोक किति जमला ! ॥


चाल


घाट कात्रजचा जवळ झाला । तीन कोसाच्या अंतराला ।


शक्कल सुचली शिवाजीला । खानाची फौज चकविण्याला ।


पोत बांधवले हो झुडपाला ! । कात्रज घाटांत ते वेळा ।


पोत बैलांच्या हो शिंगाला ! । बांधले खानाला ठकविण्याला ।


झुडपं झालीं साहाय्य शिवाजीला । पशुपक्षी झाले साहाय्य त्याला ।


दुसरा जणु रामचंद्र आला ! । नंदी झाले साहाय्य शंकराला ! ।


गाऊं किती त्याच्या पोवाडयाला ? । इकडं असा त्यानं बेत केला ।


अन्‌ एका बोलावलं मावळ्याला । गवताचा भारा दिला त्याला ।


भार्‍यामंदि घातलं तलवारीला ! । मावळा पुण्यामंदि घेउन गेला ।


तंवा शिवाजीनं । दहा वीस जण । मावळे घेऊन ।


वेष पालटून । सोडला गड, पुण्यामंदि आला ।


काळोख काळा कुट्ट भरला । वरात आली होती गणपतीला ।


गर्दिमंदि शिवराय हो शिरला । ऐकावं र दादा ॥३॥


चौक ४


लाल महालामधीं येऊन राहिला जरि खान । तरि हालचाल होईना शत्रुपासून ।


खानाला वाटलं शिवराय गेला घाबरुन । बंदोबस्त मोठा पाहून ।


खानाचं मन । होतं प्रसन्न ॥ चहुकडं सामासूम झाली ।माणसं झोंपली । गाढ झोंप आली । खानाला, नव्हतं त्याला देहभान ।


भररात्रीं खिडकी उघडून । शिवराय आणि चार जण । गेले घुसून ! ॥


खानाचा मुलगा ठार केला । झाला गलबला । खान जागा झाला !


पाहतो तों दिसला काय प्रकार । शिवाजी झाला छातीवर स्वार ।


तय्यार झाला कराया वार ॥ बायकांनीं दुःखी होऊन ।


अति गहिवरुन । हात जोदून । विनवणी केली शिवाजीला ।


"आमच्याकडं बघुन या वेळेला । जीवदान द्यावं-थोर झाला !" ॥


चाल


शिवराय बोलला खानाला । "बायकांनीं आक्रोश केला ।


म्हणुन देतों जीवदान तुला । पण ऐक माझ्या बोलाला ।


इथं राहणं योग्य नाहीं तुला । शिवाजीचा मुलुख हा झाला ।


तो घेईल तुझ्या जीवाला । जीवदान देतों आज तुला ।


जर ऐकशील एका गोष्टीला । माझ्या संगं गोटाबाहेर चला; ।


आलं पाहिजे तुम्हां सर्वाला" । खानसाहेब घाबरुन गेला ! ।


हा कोण आदमी घरिं आला । समजेना कांहीं हें त्याला ।


खानसाहेब चालले शिवाजीच्या संग ते वेळा ! ॥


गोटाच्या बाहेर जंवा गेला । तंवा बोलला राजा खानाला ॥


चाल


"धाक ज्याचा बादशाहीला । शिवाजी तोच हा आला ! ॥


जाऊं नको याच्या वाटेला । वाघनखं लाविलं पोटाला ॥


पण आठवण रहावी रे तुजला’ म्हणून छाटतों तुझ्या बोटाला ! ॥


आजपासून ऐक बोलाला । म्हण ’शास्ताखान । आपणांला" ॥असं म्हणून बोट छाटून शिवबा पार झाला !! ॥ मग खान गेला माघारा ।


लाज मोठी वाटली त्याला । तय्यार केलं फौजेला ।


अन् पाठविली पाठलागाला ॥ इकडं शिवाजीनें काय बेत केला ।


धोक्याचा करणा फुंकला । कात्रजच्या घाटांतिल पोत पेटले ते वेळा ! ॥


शिवाजी गेला त्या स्थळा । असं वाटलं यवनी फौजेला ।


अन् कात्रजच्या घाटाकडं गेली पाठलागाला ! ! ॥ ततं जाऊन पाहती त्या वेळा ।


अन् परतले सारे माघारा !! ॥ पर इकडं सिंहगडावरी शिवा पार झाला ॥


चाल


गेला खान फार घाबरुन । पुणं सोडून ।


तळ हालवून । भवानी साहाय्य शिवाजीला ।


यश राजाचं वर्णायाला । शाहीर पांडुरंग झाला ॥४॥


वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात्‌ पुरंदरचा वेढा --- पोवाडा


शाहीर पां.द.खाडिलकर


ज्याच्या कबंधानं भूतळी । तीनशें जण बळी ।


घेतले पुरंदरीं । मुरारबाजी धन्य धन्य सरदार ॥


झाला तीन लोकां वीर तो प्यार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥


चौक १


शाहिस्तेखानाची केली पार धुळदाण ।


जरी आला होता एक लक्ष फौज घेऊन ।


बोटें तोडुन शाहिस्ता केला फार हैराण ।


हैराण फार होऊन । पुणें सोडून । गेला जल्दीनं ॥


जसा पाला पाचोळा उडवि पवन लीलेनं ।


किंवा ढग मोठमोठाले एका लहरीनं ।


मेंढयांचा कळप उधळावा जसा सिंहानं ।


तशि थोडी युक्ति योजून । दिला हांकलून । शाहिस्ताखान ॥


केल्या स्वार्‍या अवरंगजेबाच्या मुलखामधून ।


चार दिवस सुरत शहराची लूट मारुन ।


अगणित द्रव्य जवाहीर मोतीं घेऊन ।


भयभीत केला यवन । यवनांची झाली गाळण ।


ध्यानीं मनीं दिसतो सैतान । झोंप ही न छान ! ॥


कोण रात्रीं झोंपेंतून उठती बरळ बरळून ।


पाहती स्वप्न आणि त्यांत शिवा सैतान ! ।


भिंतीला जाऊन थडकती वेगवेगानं ।


आरडती किंचाळून कोण । सैरावैरा धांवती कोण । वस्त्र सोडून ! ॥


’शिवाजी डोंगई उंदीर फार लहान ।


तो करतो काय चिरडून त्याला टाकीन---’ ।


असा होता बादशहाचा वेडा हो भ्रम । शिवाजीनं केली धामधूम ।


धामधूम झाली पाहून । शाहाचं मन । झालं हो खिन्न ॥


उंदीर नव्हे हा, असे रे जहरी बाण । आला ! आला ! जाइल छातित्‌नं पार घुसून ।


पादशाही करिल हैराण, काळ दारुण ! । दारुण करुनिया रण ।


कणिं करिल यवनकंदन । करिल धुळदाण ॥ चाल ॥


अवरंगजेबाला शत्रु प्रबळ हा झाला ॥ शाहिस्त्याची फजिती ऐकून शाहा लाल झाला ॥


शिवाजीचा कांटा काढण्याचा बेत त्यानं केला ॥ मग बोलला जयसिंगाला ।


"शिवा मोठा पुंड हो झाला । त्यानं मुलूख हैराण केला ॥


हा कांटा मोंगलशाहीला । जर असा वाढूनच दिला ।


तर होईल भारी आम्हांला । मामाचा मोड त्यानं केला ।


प्रतापगडीं खान ठार केला । लुटालूट केली सुरतेला ।


त्यानं केल जेर शिद्दीला ॥ दरारा त्याचा मुलखाला ।


हें विघ्न आमच्या राज्याला । तुम्ही जावं पारिपत्याला ।


दिल्लीरखान तुमच्या मदतीला । कांटा हा काढा या वेळा" ॥


असं बोलला जयसिंगाला । मग शाहा बोलला एकांतीं दिल्लीरखानाला ॥


’तुम्ही जावं जयसिंगराजाच्या संगें मदतीला’ ॥


पण कानमंत्र हा दिला । "नीट ठेवा तुमच्या लक्ष्याला ।


जयसिंग हिंदु हा होईल फितुर शिव्याला ! ॥


हिंदु हिंदु एक होतील होइल घोंटाळा ॥


बारीक सारीक सार्‍या बातमीला । नीट काढा आतां या वेळा ।


नीट ठेवा त्याच्यावर डोळा । आणि स्वारी फत्ते करुन यावं दिल्लीला" ॥१॥


चौक २


मग फौज ऐंशीं हज्जार । पायदळ, स्वार ।


घेऊन पेंढार । मिर्झा राजा आणि दिल्लीर आला ॥


वेगानंच दख्खन देशाला । हिंदवी राज्य चिरडण्याला ॥


मिर्झा राजा आणि दिल्लीरखान । राहु केतु जाण ।


आले जोडीनं । ग्रासाया सूर्यशिवाजीला । हिंदू हिंदूला काळ झाला ।


निखारा अस्तनींत पडला ! ॥ हत्ती घोडे बैल आणि उंट ।


होते अफाट । तोफा घनदाट । थाट माट तेव्हां फार केला ।


आकाशीं धुरळा दाट भरला । सूर्याला पार लोपवीला ॥


चाल


विजापूरच्या आदिलशहाला । अवरंगजेबानं धाडलं पत्र ते वेळा ॥


कीं "करा मदत आतां या वेळा । शिवाजीनं पुंडावा केला ।


अफझुलखान तुमचा ठार केला । देतो हा पीडा मुलखाला ।


हा शत्रु तुम्हां आम्हाला । दोघं मिळून चिरडूंया त्याला ।


मी फौज मोठा धाडली हो दख्खन देशाला ॥


तुम्ही पाठवा फौज या वेळा । दोघं उचल खाऊं या वेळा ।


आणि करुं ठार हो त्याला । सापाचं पिल्लु हा झाला ॥


वेळींच डोकं ठेचुं या आज या वेळा" ॥ आदिलशहा पत्र वाचून खूष फार झाला ॥


फाजलखान फौज देऊन धाडला मदतीला ॥ आणि गेली पत्र कितिकांला ।


जावळीच्या मोर्‍याचे मुलगे-बाजी, अंबाजी-गेले मदतीला ॥


शिवप्पा नाईक बेदनुरचा । जहागिरदार बसवपट्टणचा आला मदतीला ॥


माणकोजी धनगरही आला । कोळीराजे गेले मदतीला ।


शिवाजीचा नाश करण्याला । कुर्‍हाडीचा दांडा गोत्याला काळ हो झाला ॥


कुंपणानं खाल्लं शेताला ! । भावानं मारलं भावाला ! ।


असो असे राजे यवनांच्या गेले मदतीला ॥ जयसिंग दक्षिणेंत आला ।


सासवड गांवीं तळ त्यानं दिला । आणि पुढच्या स्वारीचा विचार त्यानं सुरु केला ! ॥२॥


चाल


"जे वीर पुरुष जाहले । आर्य आपुले ।


सर्व बिघडले । दास ते बनले ।


मनिं मानलालसा धरुनी अंकित झाले ! ॥


चाल


हें असें मला बघवेना, या पुढें ॥


पाहुनी चित्त हें माझें तडतडे ! ॥


निशिदिनीं हृदय हें माझें धडधडे ॥


चाल


क्षणभर मजला चैन देइना क्षात्रधर्म हा भला ।


देह हा या कामीं वहिला ! ॥


चाल


पर राजे आज तुम्ही दया दाखवा मला ॥


हा तुमच्या शब्दाबाहेर नाहीं राहिला ।


जसे वडील माझे तस्सेच तुम्ही हो मला ! ॥


दोन शब्द सांगणं तुम्हांला । हा अधिकार ना मला ! ।


हें धरा पोर पोटाला । आणि क्षमा करा हो मला ।


परचक्र मोठं हें आलं हिंदू राज्याला ॥ हा वृक्ष आम्हीं लावला ।


आतां तुम्ही वाढवा त्याला । मोंगलाचा मुलुख मी देतों परत मोंगलाला ॥


द्या तुमचा सल्ला या वेळां । मी येतों तुमच्या भेटीला" ।असं पत्र धाडलं शिवानं हो जयसिंगाला ॥३॥


चौक ४


ही बातमी ऐकून मोंगल दिल्लीरखान ।


लाल झाला रागानं म्हणे ’हा जयसिंग कोण ? ।


तह करणार शिवाजी संगें मोठया ऐटीनं ।


हिंदु हिंदु एक होऊन । मला आतां दूर वगळून ।


शाहाशीं झाला बेइमान । आज संपूर्ण ॥


मग मिर्झा राजाला बोलला दिल्लीरखान ।


"तह नका करुं शाहाच्या हुकमावीण ।


कायमचा कांटा काढायची संधि सोडून ।


कां असें मनीं बिचकतां आज हो आतां ।


धीर सोडून" ॥ जयसिंग बोलला "ऐका हो दिल्लीरखान ! ।


उंदीर नसे हा शिवा, सिंह भीषण । कितिकांना खडे चारुन केलं हैराण ।


कितीकांची मान फाडून । कितीकांचीं बोटं तोडून ।


धूळ चारुन गेला वेगानं !" ॥ मग बोलला राजाला मिया दिल्लीरखान ॥


दाढीवरन्म मोठया तोर्‍यानं हात फिरवून ।


"शिवाजीला झाला सामील तुम्ही आंतून । केला घात फंदफितुरीनं ।


हिंदुला घेरलं हिंदूनं । असं मला सांगतय मन । बोला आपण ! ॥


चाल


वाटेल तें तुम्ही हो करा । बेत तुमचा आवडेना मला ।


मी जातो पुरंदराला । सर करतों पुरंदर किल्ला ।


तुम्ही जावं सिंहगडाला । शिव्याचा धाक नको मला ।


मी धरीन त्याच्या कानाला । अन् फरफटत नेइन दिल्लीला ।


तो कुत्रा करतो काय मला ? । तुम्ही खास फितुर हो झाला ।


म्हणुनि बोलता असल्या बोलाला" । असं म्हणुन चालला दिल्लीर पुरंदराला ॥


डोईची पगडी काढून ठेवली भूमीला । अन् बोलला खान आपणाला ।


’सर करिन पुरंदर किल्ला । तरच घालीन पगडी डोक्याला’ ।


असा त्यानं निश्चय केला ! अन् मग मोठी फौज घेऊन तिकडं चालला ॥४॥


चौक ५


गडामध्यें पुरंदर गड । मोठा अवघड ।


भयंकर चढ । धडधडे ऊर बघुन त्याला ।


दिल्लीरखान खिन्न झाला । निराशा झडपी हृदयाला ! ॥


पर मोठी हिय्या धरुन । फौज घेऊन । चाल्‌ला जल्‌दीनं ।


पुरंदर किल्ल्याखालीं आला । देश जाळून फस्त केला ।


किल्ल्याला वेढा त्यानं दिधला ॥


चाल


इकडं शत्रु पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ! ॥


इकडं वेढा घाली दिल्लीर । वर होता बाजी मुरार ॥


पसरला सेनासागर । मधें पुरंदर कमळ ॥


पुरंदर कमळ सुंदर । वर शोभे देव मुरार ॥


चाल


मुरारबाजी शूर सरदार । योद्धा घनघोर ।


शिवबाचा प्यार । झाला तय्यार झुंजण्याला ।


फिकीर जीवाची नव्हती त्याला । किल्ल्याचा बंदोबस्त केला ॥


धान्याची तरतूज केली । किल्ल्यावर भली ।


शस्त्रं जमविली । तोफ चढविली हो बुरुजाला ।


कडेकोट बंदोबस्त केला । झाला तय्यार झुंजण्याला ॥


चाल


मुरारबाजीनं बेत केला । गनीमाचा लोक फार आला ।


भेडसवावं दिल्लीरखानाला । म्हणून पठाणाचा वेष केला ।


मावळा पांचपन्नास मदतीला । रात्री किल्ल्याच्या खालीं केला ।


शत्रुच्या छावणीमंदि शिरला । रखवालदार ठार केला ।


दारुगोळा सारा लुटून नेला । अन् चट्‌कन किल्ल्यावरती गेला ! ।


यवन मग उठला पहांटेला । बघतो दारुच्या कोठाराला ।


अन् मारतोय हात कपाळाला । आज काय दारुगोळा नेला ।


उद्यां काय चोरटा हल्ला केला । परवां ठार केला शिपायाला ।


बभ्रा हा रोजच्या रोज झाला ! । एकदां रात्रीच्या समयाला ।


मुरारबाजीनं, पंचवीस जणं, मावळे घेऊन, वेश बदलून हल्ला केला ।


पठाण सार होता झिंगलेला । मुरारसिंहानं हल्ला केला ।


तलवारीनं चिरलं कितीकाला । यवन खडबडून जागा झाला ।


हात मग मारतोय तोंडाला । तोबा ! तोबा ! सैतान हा आला ।


पळतो वाचवायला जीवाला । कितिक दरीमंदि खाली पडला ! । ऐकावं र दादा ॥


चाल


मग झाला रागानं लाल दिल्लीरखान ।


म्हणे ’ठार करिन सैतान तलवारीनं ।


उद्यां शर्थ करुन हा खास गड जिंकीन’ ।


वर्णन पुढच्या चौकांत पुढं सांगीन ॥५॥


चौक ६


निकराचा हल्ला मग केला । सुरुंग लावला ।


गडाच्या बुरुजाला । तोफांचा मारा वरनं झाला ।


सुरुंग लावणारा ठार केला । मुडद्यांचा मोठा ढिगारा पडला !।


धडधडा धुम् धुम् धडधडा । आवाज कडकडा ।


गोळे धडधडा । धडकती येऊन बुरुजाला ।


बुरुज कोसळला धरणीला । आणीबाणीचा काळ आला ! ॥


चाल


शत्रु होता पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ॥


तरी त्यांनीं केलं बेजार । दिल्लीर झाला दिलगीर ! ॥


परि फौज होती अनिवार । मुरारबाजी काय करणार ? ।


तरी त्यानं केला बहु जोर । कितीकांना केलं हो ठार ! ॥


चाल


ढांसळला बुरुज किल्ल्याचा ! मुरारबाजीचा ।


बुरुज हृदयाचा । त्वेषानं लालेलाल झाला ! ।


मावळे घेऊन हल्ला केला । गातों मी त्याच्या पोवाडयाला ॥


शत्रूंचा हल्ला उधळला । मुरार परतला ।


खान वेडा झाला । बघून मुराराच्या प्रतापाला ।


मग त्यानं दुसरा बेत केला । पुरंदर किल्ला जिंकण्याला ! ॥


चाल


पुरंदरच्या एका बाजूला । एक किल्ला होता दुसरा ।


वज्रगड म्हणती हो त्याला । त्या किल्ल्यावरनं डागाव्या तोफा या वेळा ॥


मग पुरंदर किल्ल्याला । थडकेल जोरानं गोळा ।


असा बेत खानानं केला । अन् तिकडं मोर्चा फिरविला ।


बाबाजी बोवाजी वरती होता त्या वेळा । यशवंतराव त्याचा हो भाऊ धावला मदतीला ॥


दोघांनीं नेट फार केला । धारातीर्थीं देह टाकला ।


खानानं किल्ला सर केला । तोफखाना वरती चढविला ।


काळ मोठा कठिण हा आला । आतां पुरंदर खास गेला ।


असं वाटलं मुरारबाजीला । निकाराचा विचार त्यानं केला ।


मग बोलला आपल्या बायकोला । सांगेल शाहीर आतां पुढच्या चौकाला ॥६॥


चौक ७


मुरारबाजी बोले बायकोला । "आला हा घाला ।


आज किल्ल्याला । शिकस्तीचा यत्‍न मी केला ! ॥


किल्ल्याचा बुरुज तडकला । ढांसळून गेला ।


शत्रु हा आला । निकराचा काळ ग आला ।


थोडासा उशीर जर झाला । होईल घोंटाळा ।


आज या वेळा । सर करील शत्रु हा किल्ला,


लाज आम्हांला ॥ जर किल्ला हातचा हा गेला ।


डाग कीर्तीला । जन्मभर जडला ।


कसं काळं तोंड दाखवूं मी शिवरायाला ॥


जावं अस्सं याच घटकेला । शत्रु चिरण्याला ।


वाटतंय मजला । धारातीर्थी देह टाकून जावं या वेळा ॥


चाल


पर पाश एक जीवाला । प्रेमाचा तुझ्या ग झाला ! ॥


कसं तोडू प्रेमपाशाला । ही एक चिंता ग मजला ॥


चाल


तव नेत्र सोडिती बाण । जाती भेदून ।


हृदय या वेळा । तव लाल अधर मोहती सखे !


हृदयाला ! ॥ करपाश तुझे बलवान ।


गुंतलों हरिण । तडफडे मीन ।


कर्तव्यकर्म परि असं आलं दारुण ॥


चाल


काळ इतक्या वर्षांचा गेला । सुख नसे तुझ्या वांटयाला ॥


सदानिदा जातों स्वारीला । सोडुनी सखे ! मी तुजला ॥


काय पाप पूर्वजन्मीला । केलस ग ठाव कोणाला ? ॥


म्हणुन पती असा हा आला । सखये ! ग तुझ्या दैवाला" ॥


चाल


बोलला असे हे बोल । प्रेम-कल्लोळ ।


हृदयिं खळखळले ! । भेटाया तिला नेत्रांतुन मग ते आले ! ॥


प्रेमानं मिठी मारुन । झाला एक क्षण ।


स्तब्ध ते वेळा । पण अश्रु टपटपा गालावर गळला ! ॥


चाल


प्रियपत्‍नी बोले मग त्याला । जरि जीव व्याकुळ झाला ॥


"नका होऊं खिन्न या वेळा । प्रेमाच्या तोडा पाशाला ॥


चाल


तुम्ही शूरवीर रणधीर । पंचानन रणझुंजार ! ॥


किती जन्म नवस मी केले । म्हणुनी मी भार्या झाले ॥


अजि नाथ ! भाग्य मम फुललें । म्हणुनी मी भार्या झालें ॥


अबलेला तुम्ही वरलें । हें शरीर पावन केलें ॥


चाल


कर्तव्यकर्म आचरतां । धर्मार्थ तनू ही पडतां ।होईल सौख्य मज नाथा ॥ झणी तोडा मम पाशाला ॥


हें राज्य नसे शिवबाचें । हें राज्य देव-धर्माचें ! ॥


माजलें बंड यवनाचें । होतात हाल अबलांचे ! ॥


पर्व हेंच स्वातंत्र्याचें । धन्य, जो रणावर नाचे ॥


चाल


मी वीरपत्‍नी, तुम्ही वीर । गाजवा रणीं समशेर ।


होउं द्या युद्ध घनघोर । जा पाशा तोडुनी सारा ! ॥


पण क्षण एक गडे ! थांबाबं ! मी पंचारती आणीन ॥


अक्षता भाळिं लावीन । प्रेमानं दृष्ट काढीन ॥


डोळाभर मग पाहीन । मग निरोप मी देईन" ॥


चाल


बोलली अशी ती अबला । डोळ्यांतुन अश्रु गळला ।


गद्‍गदा कंठ गहिंवरला । ओंवाळुनि मग नाथाला ।


जाहली धन्य ते वेळा ! ॥७॥


चौक ८


जगदंबा मातेचं सत्वर करुनी स्मरण ।


प्रिय पत्‍नीकडे शेवटली दृष्टि टाकून ।


शेंपाचशें मावळे रणवीर संगें घेऊन ।


ढाल फिरंग करिं घेऊन । चालला वेगानं । शिवाचा बाणा ॥


जसा सिंह चवताळुन दरीमधुन तो यावा ।


एकाच झडपेनं मस्त हत्ती फाडावा ।


तसा दिसला डोळ्याला मुरारिचा देखावा ।


तो प्रसंग कविला कां न च स्फूर्तिद व्हावा ? ॥


का वीर्यवृत्तिचा मूर्तिमंत हा पुतळा ! ।


अभिमन्यु बाळ हा किंवा दुसरा नटला ! ।


कां प्रलयसिंधु हा शिखरावरुनी सुटला ! ।


यवनांचा कराया अंत । जोरानं जात ।


तेज उधळीत । आज या वेळा ! ।


तंवा बसला होता हत्तीवर दिल्लीरखान ।


त्यानं पाहला वरनं येतांना मुरार खवळून ।


थरथरलं ऊर खानाचं त्याला पाहून ! ।


म्हणे, "सिंह आला रे आला । फाडाया मला । जबडा उघडून" ॥


खणखणले भाले तलवार । झुंजती वीर ।


म्हणती ’हर हर महादेव’ वीर गुंग झाला ।


लढाईचा कैप त्यांना चढला । प्रेतांचा ढीगच्या ढीग पडला ।


हाडकारक्तांचा काला झाला ! ॥ केली शर्थ मुरारबाजीनं ।


कितीक कापून । आला जोरानं । खानानं पाहिलं समोर त्याला ।


होता रक्तानं मुरार न्हाला । जणूं काय सूर्य उगवणारा ! ॥


चाल


खान बोलला मुरारबाजीला । "पाहुन रे तुझ्या शौर्याला ।


हा खान खूष फार झाला । घे कौल आज या वेळा ।


अन् ये शरण आज खानाला । शिफारस करीन शाहाला ।


अन् चढवीन मोठया हुद्याला । नाहींतर मरशील व्यर्थ या वेळा" ॥


ऐकून शब्द खानाचे मुरार लाल झाला ॥ मग बोलला वीर खानाला ।


"काय येऊं शरण तुर्काला ? । काय विकूं देह मानाला ।


हा देह दिला धर्माला । हा मुरार बळी पडणार नाहीं मोहाला ॥


एक वेंळ गळेल भूमिला अढळ ध्रुव तारा ॥


पण मुरारबाजी हा सदा अढळ रे झाला ! ॥


देहाचा चूर जरि झाला । तरि फिकीर नाहीं रे मला" ।


असं बोलला वीर खानाला । खान हत्तीवरनं उतरला ।


अन् दोघांचा संग्राम झाला । गर्जती वीर ते वेळा ।


कानठळी बसली कानाला ! । दैवाचा घाला पण आला ! ।


मुराराच्या हातावर वार जोराचा झाला । ढाल पडली खालीं भूमिला ।


मग शेला बांधला हाताला । आणि वीर गर्जूं लागला ।


खानावर वार त्यानं केला । पण तो वार निसटून गेला ।


इतक्यांत खानानं सोडलं एका तीराला ! ॥ तीर लागला मुरारबाजीला ।


तीरानं तोडलं डोक्याला । शिरकमळ पडलं धरणीला ! ॥


तरी धडानं कहर तो केला । धूळ चारली तीनशें यवनाला ।


मग कोसळलं धड धरणीला ॥ जीवानं सोडलं देहाला ।


’स्वातंत्र्यदेविच्या गळ्यांमधुन मणि गळला !" ॥


धर्मार्थ देह खर्चून धन्य तो झाला !! ॥८॥


चौक ९


देहाचे तुकडे जमविले । किल्ल्यावर नेले ।


मावळा मग बोले । मुरारबाजीच्या बायकोला ।


"बाईसाहेब ! मोठा घात झाला । जिवाचा मोहरा ठार झाला ! ॥


प्राण आमुचा सोडुन गेला ॥ झाला घोटाळा ऐन वेळेला ।


खान घेईल आतां किल्ल्याला ॥ काय आम्ही करावं बोला ।


अशा निकराच्या समयाला ? ॥ नाथाचं प्रेत पाहून ।


साध्वीचं मन । भरलं दुःखानं । एक क्षण आली घेरी तिजला ।


डोळ्यांतुन अश्रु फार गळला । अंगाला कंप सारा सुटला ! ॥


चाल


पण दुःख सारं आवरुन । त्वेषानं लाल होऊन ॥


बोलली साध्वी जोरानं । पळतांना मावळा पाहून ॥


"कुठं जातां धीर सोडून । मी आलें खड्‌ग घेऊन ।


द्या दुष्ट शत्रु हांकलून । जा ! मरा ! झुंज झुंजून" ॥


चाल


असं बोलली साध्वी मावळ्यांला । नवर्‍याच्या प्रेतावर शेला ।


टाकून गेली युद्धाला । मावळ्यांना चेव तंवा आला ।


अन् करती घोर युद्धाला । खानानं पाहिलं वर तिला ।


अन् तोंडात घातलं बोटाला । मग बोलला आपला आपणाला ।


"सैतानखाना हा झाला । आतां औरत आली लढण्याला ! ।


सोडावं आतां नादाला । काढावं आतां वेढयाला ।


सर करणं असल्या किल्ल्याला । फार बिकट काम हें मला" ।


असं म्हणून वेढा काढून खान चालला ॥ मग साध्वी आली माघारा ।


पालखींत घातलं प्रेताला । अन् पालखी घेऊन चालली रायगडाला ॥


शिवराज आले सामोरा । गडावर नेलं पालखीला ।


शिवराज व्याकुळ झाला ! । खालीं काढलं त्यानं प्रेताला ।


अन् ढळढळां रडूं लागला ! । जिजाबाई बोलली साध्वीला ।


"बाई ! उपमा नाहीं ग तुला । देशाला प्राणपति दिलास् ।


अन् राखलस् ग तूं ही किल्ल्याला ॥


चाल


त्वत्समान शंभर अबला । जर मिळतिल या देशाला ॥


जाईल दुःख विलयाला । चमकेल सुखाचा तारा ॥


चाल


तव पती जाहला धन्य ! । या समान कोणी न अन्य ।


चिरकाल जोडलं पुण्य । हा वंद्य तीनि लोकांला" ॥९॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा