शिव जयंती पोवाडा

 शिवदर्शन (पोवाडा) – शाहीर आत्माराम पाटील

(चाल : अलंकार)


अलंकार दिव्य पृथ्वीचा, विश्व मोलाचा,


कीर्ति किरणांचा । संगती सूर्य चंद्रमाचा,


छत्रपति वंद्य हिन्दभूचा । प्राण शिवराया मराठयांचा ॥


इतिहास काळाला गती, देई उगवतीं, ज्याची संस्कृती ।


प्रथमतः लोक स्वराज्याची, अतुल अवनी युगपुरुषाची ।सांगतों जन्मकथा त्याची ॥ ती धन्य वीर माऊली,


वनीं प्रसवली, ’हिन्द भू मौली’, पतिवर असतां रणघाई,


रणीं गर्भाचा भार साही । स्वराज्यमाता जिजाबाई ॥


(चाल : दौड )


त्या शूर जनक जननीचा त्रिलोकी डंका ॥


ज्यांनीं दिला शिवाजी राजा आम्हांला बांका ॥


हा त्रिवार मुजरा करुन हिन्दी लोकां ॥


गातो ’आत्माराम’ इतिहास पवाडा ऐका ॥


बहामनी राज्य मोडले, त्याचं पांच तुकडं जाहलं, नांव त्यांचं एक एक भलं ।


कुतूबशाही ? गोबळकोंडयाची ! बारीदशाही ? बिदर शहराची ! इमादशाही ?


वर्‍हाडी मुलखाची ! आदिलशाही ? विजापूराची ! आणि पांचवी ?


आणि पांचवी निजामशाही ती अहमदनगराची ॥


जिथं चांदबीबी झुंजली महाराष्ट्राची ॥


चाल : अलंकार


हें राज्य अहमदनगर, सुलतान गादीवर, कवळं होतं पोर ।


इसवी सोळाशें सव्वीस साला । कारभारी मलिकंबर मेला ।


शहाजी भोंसला त्राता उरला ॥


(चाल : दौड)


इतक्यांत गिळाया निजामशाही मुलखाला ॥


उलटून आला दिल्लीचा मोंगली हल्ला ॥


जो शहाजीनं एकदां होता चोपला ॥


डिवचला साप वळचणींत होता टपलेला ॥


डाव जुना होता शत्रूचा, मुत्सद्दी भेट नीतिचा ।


संकटी घाला घालण्याचा । शूरवीर शहाजी राजाचा ।


सासरा सख्या नात्याचा । जागीरदार सिंदखेडचा ।


माजी नोकर निजामशाहीचा । त्याचं नांव लखुजी जाधव बाप जिजाईचा ॥


ज्याचं धन, त्याच्यावर मनं ! अशा द्यानतीचा ॥ मोंगलांनीं कारस्थान केलं ।


जाधवाला त्यांनीं फितवलं । ’चोवीस हजार’ मनसुबा केला बहाल ॥


मोठया सरंजामदारीचे डबोलं दिलं ॥ पाहून म्हातारं चुटकन्‌ लाल चावलं ॥


दक्खनचे मीठ विसरलं, जाधव आक्खं घसरलं । शत्रूनं कासरं लावून सासरं बांधलं ॥


सासर्‍यानं जांवई सोडून बंड उचललं ॥ जावयानं सासर्‍यासंगं दंड थोपटलं ॥


चाल : स्फूर्ति


सासरा लखुजी जाधव मिळे मोंगलां ।


जांवई शहाजीराजा त्राता निजामाला ।


दारच्या शत्रुंनीं घरांत दावा लाविला ।


राखाया बाळ निजामाला, शहाजी भोंसला,


पणा लागला, ऐका कवनाला ॥


चाल : वीरश्री


महाराष्ट्राची मुस्लीमगादी वांचविण्यासाठीं ।


हिन्दु-मुस्लीम ऐक्य साधलें ध्येय हें मराठी ॥


शहाजीनं विचार मग केला । घेतलं बाळा निजामाला ।


आणि त्याच्या विधवा मातेला ।


चाल : दौड


घेऊन फौज दरबार त्यानं सोडला ॥


वीर-पत्‍नी बाई जिजाई होती संगतीला ॥


पुढं पति मागं दुश्मन बाप लागला ॥


काय करावं अशा समयाला ?


सुपारीवर आडकित्ता आला !


चाल : वीरश्री


दुजी रुक्मिणी विदर्भाची ती महाराष्ट्रमानी ॥


भ्रष्ट पिता विसरुन पतीसह निघे स्वाभिमानी ॥


चाल : दौड


दर मजल करीत हा सेनासिंधु चालला ॥


चाललं लाव लष्कर बांधूनी ढाला ॥


ठाणें जिल्ह्यांत थेट माहुलीचा किल्ला गांठला ॥


चाल : अलंकार


ठाणें जिल्ह्यात शहापूरवरला, कडेकोट भला, माहुली किल्ला ।


कसारा घाटाच्या डोंगराला । काळा पाषाण आहे मढला ।


निळ्या गगनाला उभा भिडला ॥ शूरवीर शहाजी राजानं,


मांडलं सैन्य, दाणावैरण । दारुगोळा समदा वरती भरला ।


शत्रुचीं मुंडकीं उडविण्याला । ठेवला चौफेर खडा भाला ॥


चाल : रणघाई


आलं, आलं ! आलं मोंगल सैन्य माघारीं आलं धडधडा ॥रं मर्दा॥


घेरलं ! घेरलं रान चौफेरी ! चौफेरी घेरलं गडा ॥


रणशिंग ! रणशिंग वाजे रणभेरी !


रणभेरी तोफा धडाधडा ॥ खणखणती ! खणखणती ढालतलवारी !


तलवारी पट्टा फडफडा ॥


खिंकाळे ! खिंकाळे घोडा लष्करी ! लष्करी दणाणे कडा ॥


लावी सुरुंग शत्रु खालीं । तटावरची आग ये भालीं ।


साथ


त्याचा जिताच भाजून हुरडा झाला खालीं ॥


शत्रुची तटाला शिडी । शिडीसहित ढकलावा गडी ॥


साथ


त्याची उभ्या कडयाच्या दरींत तिरडी गेली ॥


जो शत्रु पायाला भिडला । उकळता पाणी वर पडला ॥


साथ


पाण्याची धार मुडद्याच्या हाडांना चढली ॥


जो शत्रु तटावर चढला । आरपार कंठांतून भाला ॥


साथ


त्याच्या मुंडकं आणि देहाची फाळणी झाली ।


चाल : विजया


आगीचे लोळ किती यावं । थबकावून धूळ विझवावं ॥हे दाजी र॥


किल्ल्याला उलटं फेकावं । रानसिंग शत्रु जाळावं ॥


शत्रुच्या वेढया बाहेर । अंधारांत आमचं हेर ॥


जाळीतनं चंद्र निघणार । शीर छाठून गारोगार ॥


दोन्हींकडून खाऊनी मार । झालं मोंगल जर्जर फार ॥


खालीं वणवा वरती धूर । आंत रणाचा हाहाःकार ॥


चाल : स्फूर्ति


घनघोर चाले संग्राम किल्ल्याच्या भंवतीं ।


तोफांनीं हादरे ठाणें जिल्ह्याची धरती ।


नरमांस खावया गगनीं गिधाडें फिरती ।


सहा महिने चालला लढा, उठेना वेढा, किल्लाहि खडा, झुंजवी छाती ॥


पाहून शहाजीचा जोर, सासरा चोर, मोंगल सरदार, लखुजी जाधव गार झाला ।


लढाई करण्याचा जोम सरला । कपटाचा खेळ सुरु झाला ॥


चाल : हळहळ


जाधवानं डाव फिरविला ॥जी॥


भेटे निजामाच्या आईला ॥जी॥


लाघवी बोल बोलला ॥जी॥


"बाईसाहेब ! कां सोसतां यातना जीवाला ?


करा तह मिळा मोंगलां । तुम्ही अहमदनगरला चला,


देतों राज्य तुमचं तुम्हांला । मी रहातों तुमच्या दिमतीला ।


माझा शब्द लाखाच्या मोला । हा स्वार्थि शहाजी भोंसला ॥जी॥


तो गिळील तुमच्या मुलखाला ॥जी॥


त्याचा काळा डाव साधण्याला ॥जी॥


तुमच्या आमच्यांत तंटा लावला ॥जी॥


फंसूं नका ! फंसूं नका, अशा प्रसंगाला ! सावधान !


देतों इशार्‍याला !" अशी ऐकून बात, काय सांगूं मर्दा मात,


भोळी बायांची जात । पाघळून देई हात लखुजीला ॥ जी॥


परक्यांचा शब्द ऐकला, टोचून बोले घरच्याला । तिचा शब्द विषारी आला,


झोंबला शहाजी राजाला । झाली फितूर शत्रूला बाई, धन्याची आई,


बघा धन्यापायीं । शहाजी, दुष्मनाशीं लढला । धनीच तो शत्रुस वश झाला ।इमानाची दुनिया नाहीं बोला ॥ माहूली डोंगरी किल्ला ।


घनदाट रान भंवताला । रणरंग भंग जाहला ।


किल्ल्याभंवतीं लढाई, तटावर हातघाई, आंत होती जिजाबाई ।


सात महिनं गेलं होतं तिला ॥जी॥


गरोदर जिजाबाईला । जरि सातवा महिना चालला ।


तरी दगड, माती, चिंचा खा नव्हता असा डोहाळा ॥जी॥


ऐका हो, डोहाळं कसं जिजाबाईला ॥


चाल : दामिनी


बुरजावर झुंजे भरतार, तिरकमठं चालवी नार ॥


चिलखतं तंग अंगाला, कुठं बत्ति देई तोफेला ॥


धुमधडाम धूर गगनाला, त्या धुरांत चमके चपला ॥


आईची माया घायाळा, दे स्फूर्ति लढणार्‍याला ॥


चाल : वीरश्री


मूर्तिमंत ती समर वीरश्री चेतविते किल्ला ।


मुक्ति रणाचे शौर्य डोहाळे तिथें जिजाईला ॥


मातृगुणांची कूस घडविते उदरीं बाळाला ।


स्वराज्यकर्ता रणमर्दिनीच्या कुशींत गुण शिकला ॥


चाल : चिंता


फितुरीनं केला घात, राजावर शत्रुचा दांत ॥


आलं मरण उद्यांच्या आंत । कशी टळत आजची रात ॥


झालीं दोघं चिंताक्रांत । सटकायचा केला बेत ॥


चाल : समता


सटकायचा बेत जरी केला शहाजी राजानं ।


तरी इतिहासकार होतं वीरांचं ध्यान ।


थांबतां इथं किल्ल्यांत निकामी मरण ।


पण फरार होतां म्हणतील बेईमान ॥


बेईमान ॥ सांकडं सोडवायला, राजानं मार्ग काढला,


आपुल्या सख्या भावाला ॥ शरभोजी भोंसला याला,


हा प्रसंग समजाविला । भावानं हात पुढं केला,


लक्ष्मण बोले रामाला । तुम्ही खुशाल लागा वाटेला,


ही स्वामिनिष्ठेची तुला, भारोभार पुरी करण्याला ।


वाहीन प्राण आपुला ।


चाल : दौड


बोलतां दोन्ही भावांचा गहिंवरे गळा ॥


शरभोजी राही किल्ल्यांत स्वामिनिष्ठेला ॥


आगींत एक; फोफाटा नेई दुसर्‍याला ॥


माउली जिजाबाईला, एक बाळ पहिला चिमुकला,


होता चार वर्षांचा झाला । नांव होतं संभाजी त्याला !


तोही छावा संगं घेतला, निवडक वीर जोडीला ।


तलवार, भालं हातांत ! पाठीला ढाला ॥


एक त्यांत वायुवेगाचा वारु निवडीला ॥


जाहली जिजाई स्वार घोडा नाचला ॥


अन् समद्या वीरांनीं लगाम तंग ओढला ॥


फुरफुरलं घोडं ! दरवाजा जरा करकरला ॥


चाल : अलंकार


रणधीर शहाजी राजानं, केलं उड्डाण, रात्र भिणभिणं ।


वेढा फोडून घोडा सुटला । टापांच्या विजेत मार्ग दिसला ।


आडवा फिरला तो उभा चिरला ॥ भरधांव वारुवर स्वार ।


जिजाबाई शूर, कटीं तलवार । रिकिबींत पाय लगाम हातीं ।


हिन्दस्वराज्याचा ठेवा पोटीं । घेऊन दौडली सांबशक्ति ॥


घोडयांनीं तुडविती अंगा, शत्रु झाला जागा, जो तो करी त्रागा ।


’पकडो रे दौडो शहाजी भागा ।’ लेक-जांवई गेल्या मागा ।


सासरा लागला पाठलागा ॥


चाल : दौड


धडधडा शहाजी राजा पुढें चालला ॥


विजापूरच्या आदिलशहाची साथ घेण्याला ॥


माहुली विजापूर पल्ला । तीनशें मैल तो भला ।


दिसरात नाहीं पाहिलं ! मार्ग तुडविला ॥


महाराष्ट्र-धरणीचा रोमरोम शहराला ॥


तरुकडी कपारीनं आड पहारा दिला ॥


तितक्यांत आडवाटेनं पल्ला काटला ॥


पण घरचा बगळा पांढरा उडतो गगनाला ॥


त्याला हेरुन मोंगल सेनेनं माग काढिला ॥


चाल : वीरश्री


पुढं चालला महाराष्ट्राचा शहाजी रणधीर ।


मागं लागली मोंगलसेना प्रचंड दळभार ॥


पतीसवें ती फेकीत घोडा जिजाई गर्भवती ।


दौडत होती फर्लांग मारीत सह्याद्रीवरती ॥


घौडदौड शिकविली बाळाला आईनें उदरीं ।


अश्वपाळणा झोकित होती शौर्याची दोरी ॥


चाल : स्फूर्ति


लागला पाठीला क्रूर शत्रु सेनानी । पुढें उभे दरी डोंगर उतरणी ।त्या ओलांडीत दौडली राष्ट्रनंदिनी । रखरखीत उन्हाच्या झळा,


नाहीं सवड पाणी पिण्याला । किती दगड धोंडा तुडवीला ।


दौडली मैल शंभर, दुखावे उदर, थांबले वीर, खुल्या मैदानीं ॥


चाल : गजगामिनी


बाईचा अश्व थांबला कांस कंठाला, श्वास कोंडला, आली अंधारी ॥


डबडबला घाम अंगाला, जोम संपला, लगामहि सुटला, राजा सांवरी ॥


पाठीस शत्रुचें दळ, उडवितें धूळ, भरलें आभाळ, पाही माघारी ॥


पोटास गर्भाची कळ । चालवेना एक पाऊल । झाली जिजाबाई व्याकुळ ।


जर भिडला शत्रु येऊन, अटळ त्यातून, पतीचें मरण, आठवे नारी ॥


काळजाचें पाणी झालें । डोळ्यांचे इंगळ बनले । धगधगते अश्रु गळले ।


चाल : वीरश्री


क्रोध अनावर वीरांगनेची थरथरते काया ।


तप्ताश्रूंत दाखवीते पतीला गर्भाची माया ॥


ती महाराष्ट्र रागिणी, हा कठिण समय देखुनी ।


बोलली वीराला रमणी ।


चाल : स्वयंसिद्धा


तुम्ही चला पुढें प्रिय नाथा । सोडून पंथिं मज आतां ॥


सौभाग्य वांचवा माझें । वांचवा महाराष्ट्राचें ॥


ग्रासाया येती काळ । चुकवा हो चुकवा वेळ ॥


चाल : मौलिक


ते जिजाबाईचे बोल । मोलाचे, मोलाचे ॥


संकटांत सेनानीच्या । तोलाचे, तोलाचे ॥राखती तिथें अवधान । राजाचें, राजाचें ॥


चाल : अलंकार


राजाला सुचला विचार । जवळ एक शहर,होतं जुन्नर ।


तिथं एक होता मित्र दिलदार । नांव श्रीनिवासराव सरदार ।


स्वतंत्र होता मुलूख परिवार ॥ मित्राला हवाला दिला ।


जवळ आहे भला । शिवनेरी किल्ला । उंच कडणीच्या डोंगराला ।


किल्ल्यांत ठेवलं जिजाईला । धन्य तो मित्र तैनातीला ॥


चाल : समता


सोबती ठेविला बाळकृष्ण हणमंत ।


सोनाजीपंत नी शामराव नीलकंठ ।


रघुनाथराव बल्लाळ मर्द गुणवंत ।


सैनिक पांच पंधरा धीराला देत ॥


गर्भार अस्तुरी ठेवुन शिवनेरींत ।


गांठणें विजापूर केला पुढचा बेत ॥


परि वियोग दुःखें व्याकुळ बनले चित्त ।


अन प्राण उभे राहिले चार डोळ्यांत, चार डोळ्यांत ॥


चाल : वीरांगना


त्या मरणाच्या मार्गांत । जिवनाचे निरोप झाले ॥


संभाजी सवे घेऊन । राजश्री स्वार निघाले ॥


दाटला कंठ बाईचा । अश्रूंतून शब्द उमटले ॥


’सांभाळून जाहो नाथा । भेटूं किं न भेटूं आतां ।


तारील भवानी माता ॥’ ते दोन जिवांचे बोल ।


तिसर्‍या हृदयाला पटले ॥ धरणींत बीज अंकुरतां ।


अभ्रानें सूर्या गिळलें ॥ लतिकेला फळ जों धरलें ।


वृक्षावर वादळ आलें ॥ तें स्वराज्य गर्भी असतां ।


पारतंत्र्य भंवतीं फिरलें ॥ तोडाया त्याचा पेंच ।


सोसून दुःखाची आंच । घोडयास मारिली टांच ।


तोडून बेडी मोहाची । कर्तव्य फरारी झालें ॥


चाल : अलंकार


गेले सोडून शहाजीराजे, तडफ ऐसाजे, विजापूर मौजे ।


राजाची नव्हती पाठ फिरली । तोंच मागं मोंगल फौज आली ।


जुन्नर गांवाची जिद्द कळली ॥


चाल : छक्कड


सासर्‍याच्या हातावर तुरी, दिल्या शिवनेरी, ठेवुन अस्तुरी, फरार जांवई ।


हे कळलं सासरोबाला । लखू जाधवाला । चेहरा उतरला, देतो जांभई ॥


रग जिरली पाठलागाची । वैरी बापाची, आतां लेकीची आठवण झाली ।


भेटाया जिजाबाईला । किल्ल्यावर गेला । पाहून पोरीला । आंसवं आलीं ॥


त्या उंच डोंगरी गडांत, तटाच्या फडांत जिजाई होती ।


किल्ल्यांत नव्हे म्यानांत रक्त समशेर कोंबली होती ॥


पाहून तिथें लेकीला, उमाळा आला, पुढें जाण्याला, पाय लटपटती ।


जरि पोटीं मायेची ओढ, काळं थोबाडं, थांबलं घुबडं, देखतां ज्योती ॥


ती खंबीरतेची गंभीर मुद्रा खोंचक भेदक दृष्ठी ।


जणुं व्याधासाठीं जखमी वाघीण जाळींत टपली होती ॥


थरथरे बापाची काया । उफाळे माया, हांक माराया, फुटेना कंठ ।


ती स्वाभिमानी नंदिनी, पिता पाहुनी, संतोषे मनीं, झाली आरक्त ॥


ती पतिविरहाची विव्हल संध्या सु-रक्तलोचन दिसली ।


अन् गर्भित रविची अरुण गुलाली मिश्रित विलसे गालीं ॥


बापाला हुंदका आला, अनावर झाला, बोले लेकीला, शब्द अडखळले ।


बोलतां कंप कंठांत, कंप ओठांत । अश्रु नयनांत । मायेचे भरले ॥


(लखुजी जाधव---) जीजाऊ ! बाळ गुणवंती । धन्य तूं सती, फिरली माझी मती,


कष्ट तुज पडले । युद्धाचा कैफ विषारी, जाहलों वैरी, क्रोध आवरीं, क्षमा कर बाळे ॥


मी पिता निर्दयी क्रूर । विसरुनी पोर, शत्रूचें घर, स्वहस्तें भरलें ।


तूं पतिपितयांचें कूळ । केलें उज्ज्वल, मीच चांडाळ क्षमा कर बाळे ॥


तूं गर्भवती अति कोमलं माझ्या वनांतली कर्दळी गे ।


परी मीच तुला गांजिलें हाय ! परचक्राच्या वादळी ॥ क्षमा कर बाळे ॥


तूं सिंहीण महाराष्ट्राची व्याकुळ उदरीं प्रसूति कळ गे ।


मी तुझ्याभोंवती सह्यवनाला झालों वडवानळ ॥


क्षमा कर बाळे ॥ गे तुझ्या अर्धवचनांत ठेविल्या अनंत सजणी दासी गे ।


पण मीच आज डोंगरीं गडावर केलें तुज वनवासी ॥क्षमा०॥


तूं चंद्र-कलेंतील सुहास्य शालीन चंद्रमुखी कामिनी गे ।


परि आ गमे संतप्त मेघलक्तरांत सौदामिनी ॥क्षमा०॥


तूं मखमाली गादी गिर्द्यांची लाडीक राजस युवती गे ।


परि गगनाखालीं इथें मोकळ्या भेसूर दगडी भिंती ॥क्षमा०॥


चल नेतो तुला माहेरीं, ऊठ लवकरीं, लाडक्या पोरी, नको रागाऊं ।


बापानें केला अपराध, घेईं पदरात, बोल एक शब्द, बाळ जीजाऊ ॥


या शिवनेरी किल्ल्यांत, घोर रानांत, भरल्या महिन्यांत, नको तूं राहूं ।


माहेरीं आईची माया, रोप निपजाया, निंबाची छाया, बाळ जीजाऊ ॥


(पडद्या आडून शाहीर गात आहे---)


चाल : कोंकवती


अजुनी नव्हता शब्द निघाला जिजाबाईच्या वदनीं । हो॥


तप्त गालावर वितळत होतें काळीज गंगा-जमुनी ।हो॥


असह्य आतां दोन लोचनां अलोट माया पाणी ।हो॥


थरथरल्या अधरांची झांपण खुलली उसळे वाणी ।हो॥


घेतली दोन्हीं तळ हातांवर तलवार । टाकलीं पाऊलें पित्यासमोर चार ।


ठाकली उभी नजरेस भिडवुनी नजर । सद्गदित निघाले तीव्र शब्द झणकार ॥


(जिजाबाई म्हणते----)


चाल : मानिनी


जें सौभाग्यावर उठले । तें माहेर माझें तुटलें ॥


तुम्हीं चंद्र सूर्य अरि बनले । देशावर नभ कोसळलें ॥


तुम्हीं रण परकारण धरलें । रामावर भार्गव उठले ॥


हे तात ! मागणे उरलें । द्या मरण पतीच्या पहिलें ॥


घ्या खङग हातीं हे उभी पुढें मी लेक । महाराष्ट्र-ब्रिदाच्या अभिमानाची नेक ।


ही गर्दन झुकली वार करा बस एक । कीं सासर माहेर फिटलें ।


धड ठेवा शीर न्या अपुले ॥ जें सौभाग्य०॥


जा तरि, ना गळसरीवरची ॥ चुकवून तलवार पित्याची ॥


उरली सहचारीण पतीची । पण मेली कन्या तुमची ॥


वनवासी वनराजाची । मी वनराणी वनीं राजी ॥


मी राष्ट्रोद्धारक मराठमोळं कलत्र । स्वातंत्र्य आमुचें अमोल मंगलसूत्र ।


मत्प्राणपति नि सत्‍पुत्र सकल गणगोत्र । देशाला अर्पण केलें ।


तुम्हीं देशद्रोही बनले ॥ जें सौभाग्या०॥गड माझा श्रीशिवनेर । हें मायेचें माहेर ॥अंगण महाराष्ट्र समोर । वृंदावन गिरि कांतार ॥


हें कृष्णशिलासन सदर । पुष्पलता भरतील पदर ॥


चांदण्या झुंबरें रातकिडे स्वरकिन्नर । ही आई शिवाई देवी करील सुयेर ।


या कडणी शमवतील प्रसवकळांचे सूर । हें स्वराज्य मन्मनीं भरलें ।


डोहाळे यांतच पुरलें ॥ जें सौभाग्या०॥


या फुलत्या वनवेलीचा । आईला निरोप सांगा ॥


तुटलें मूळ माहेराचें । नको शिंपूं अश्रू गंगा ॥


दे वर अमृतवाणीचा । या रणरंगांतील भांगा ।


या पुढें न वदणें ! तात ! वंदितें चरणें । बोललें वेंचणें कीं गृहकंदन करणें ।


पण तुटल्या वेलीस तिच्या तरुवर मरणें। द्या सौख्य हेच शेवटलें ।


जा उतरा गड जो चढले ॥जे०॥


(जिजाऊ एका बाजूनें व खिन्न पावलानें लखूजी दुसर्‍या बाजूनें जातात---पुढें शाहिराचा पोवाडा सुरु---)


चाल : कोंकवंती


नच शब्द टाकिला पुन्हां पित्यानें ! टाकित जड पाउलें ।


उतरले, लखुजी गड उतरले ॥ नच वळून पाहिलें पुन्हां बिजलीनें !


गगन किती फाटलें । तेज तें शिवनेरींत बिंबलें ।


ती दगड कडी गडवाट वांकडी तिनें हुंदके दिले ।


उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर कठोरता कर्तव्य देवता शोकाकुल तळमळे ।


तेंज तें शिवनेरींत बिंबलें ॥ त्या शिवनेरीच्या कढणीवरुनी पारतंत्र्य घसरलें ।


उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर ’पूर्णमास’ वेदना सोसुनी स्वातंत्र्य जन्मलें ।


तेंज तें ब्रह्मांडी फांकलें ॥


साथ : टाहोचा आवाज


टाहो फोडतां शिवनेर, गगनामाजीं घुमला सूर ।


विश्वांत झाला चमत्कार । सांगतो ’आत्मा’ शाहीर ।


ऐका सारे नारीनर । गगन निळें हें गार ।


ग्रह तारे खालींवर । मध्यभागीं सूर्य स्थिर ।


धरणीपति परमेश्वर । धरणी आमुची गोलाकार ।


भंवर्‍यावाणी गर्र गर्र गर्र । गिरक्या मारीत चक्राकार ।


पति सभोती फिरते नार । एका गिरकींत आठ प्रहर ।


आठ प्रहरांचा एक वार । तीनशें साठ गिरकींत पार ।


प्रदक्षिणेचा एक घेर । खेळ मेनका-विश्वामित्र, चालला असे अधांतर ।


अनादि अंत निरंतर । एका गिरकींत चमत्कार । पाही स्थिर प्रभाकर ।


गिरकी होती पाठ म्होरं । दिसत होता छानदार; कपोलाचा अरुण मोहोर ।


तोंच घडला प्रकार । शके १५४९ शुभंकर, प्रभव नाम संवत्सर, वैशाख शु.१ वासर ।


उत्तररात्र गुरुवार, अश्विन नामें नक्षत्र ६ एप्रिल दिनक्षर, १६२७ सुंदर ।


असतां सालमजकूर, दिव्यध्वज फडकणार, घेऊन पृथ्वीनें खांद्यावर ।


गिरकी मारली पूर्णाकार, पति सन्मुख ती आली नार । ध्वज पाहतां झोकदार ।


नेत्रीं दीपला प्रभाकर । सूर्य विचारी धरणीला, पति अपुल्या भार्येला,


सांग प्रिये सांग मला । दीपववीता माझा डोळा, तळपणारा अंतराळा,


झांक देवा ब्रह्मांडाला । दिव्य झेंडा ऐसा भला, काल नव्हता देखियेला,


आज कैसा गे आणिला ॥ कशी गमे स्त्री जातीला ?


एका गिरकीत एक कला । सांग प्रिये सांग मला ॥


मुक्त छंद


धरणी सांगे सूर्याला । ऐका नाथा सांगता हे ।


मंगळसूत्र तुमचें मला निसर्गानें दिलें आहे ॥ध्रु०॥


भूगोलाची हिरवी साडी । श्यामलांगी ल्यालें आहे ।


रामकृष्ण पैगंबर, येशू बुद्ध यांनीं वर, अबदागीर धरलें आहे ॥धरणी०॥


स्त्री जातीचा जीव सारा । दागिन्यांत अडला आहे ।


इतिहास सोनारानें एकेक नग घडला आहे ॥धरणी०॥


कोलंबस कमरपट्टा । तंग अंगी जडला आहे ।


अलेक्झांडर--सिकंदर वज्रचुडा मढला आहे ॥धरणी०॥


अकबर आणि चंद्रगुप्त । चंद्राहार चढला आहे ।


नेपोलियन सोनाराच्या । अलमारींत पडल आहे ॥धरणी० ॥ जगभर थाट आहे । राजपाट अर्थ आहे ।


परि जेथें समता नाहीं । तेथें सारें व्यर्थ आहे ॥धरणी ०॥


वारुळाचा साप सम्राट मोठा असून खोटा आहे ।


स्वराज्याचा छत्रपति छोटा असून मोठा आहे ॥धरणी ०॥


सम्राटांच्या शृंगारांना गुलामींत विटलें आहे ।


स्वराज्याचा झेंडा आज हातीं घेऊन उठलें आहे ॥धरणी ०॥


तुम्हीं म्हणाल, "वसुंधरे, तुझें सारे खोटें आहे" ।


डोकावून पहा नाथा, शिवनेरींत बेटें आहे ॥धरणी०॥


जिजाईच्या कुशीमाजीं शहाजीचा बंडा आहे ।


भारताचा शिवाजी या वसुधेचा झेंडा आहे ॥धरणी ०॥


आजपासून रायाभंवतीं झेंडयावांचून फिरणार नाहीं ।


शास्त्रज्ञांना झेंडा माझा कवि वाचून कळणार नाहीं ॥धरणी० ॥


काय म्हणतां प्रिये थांब ! इश्श ! मला वेल नाहीं ।


शिवनेरीला टाहो फुटला साधासुधा खेळ नाहीं ॥धरणी० ॥


(टाहोचा आवाज--पुढें पोवाडा)


फुटला टाहो शिवनेरीला हिंद-स्वराज्याचा ।


पश्चिमेसही प्रकाश पडला प्रदीप्त पूर्वेचा ॥


शिवनेरीच्या माळ्यावरुनी शेत राखणीचा ।


सुटला धोंडा भिरभिरता त्या सह्य गोफणीचा ॥


धन्य माउली जिजाई ॥ दुनियेला साम्राज्य लांडगे असतां भंवतालीं ।


मराठी जाळींत जिजाई सिंहीण स्वराज्यास व्याली ॥युगपुरुषाच्या जगजननीचे फिटतील का पांग ।


हिन्द देवीनें हिमाद्रि वरुनी दिली जरी बांग ॥


फुटतां टाहो शिवनेरींत, ऐकतां सख्याचा साद,


संवंगडी आलं दुनियेंत । तानाजी उठवी उमराठं,


खाई पासलकर कोलांट, डोकावला हिरोजी फर्जंद ।


नेताजी बाजी दणकट, जिव्या महाल्या वळवी मूठ,


दिला फिरंगोजीनं नेट । आलं बहिर्जीचं सोंगाट ।


कुठं येसाजीचा गोंगाट । कुठं रामजन्म पावत !


कुठं झाला अंजनी सुत ! कुणी भालदार पुढं येत ।


कुणी हडपी माघं धांवत । एकदांच फुलवूं महाराष्ट्र ।


होता सगळ्या आयांचा बेत । वटवृक्षावाणी महाराष्ट्र ।


फांदोफांदीं पाळणा फुटं । केली रानमातीची तीट ।


पंचगंगांना चिरगूट । सूर्यासंगें किरणें यावीं धरणी दिपवीत ।


शिवबासंगें तसे जन्मले महाराष्ट्र दूत ॥


चाल : अलंकार


शिवनेरीं बाळ जन्मलें । विजापुरीं कळलें ।


राजे तोषले । कंठा अर्पिला जासूदाला ।


हात जोडिले भवानीला । सोहळा चाले शिवनेरीला ॥


आवतनं केलं मुलखाला, मांडला जन्म सोहाळा,


नरनारी जमला मावळा । आनंदी आनंद झाला,


पूजिलें शिवाई मातेला, वंदिलें सूर्य देवाला ।


प्रार्थिलें हिन्द देशाला, उद कापराच्या गंधाला ।


सह्याद्रि लुब्ध जाहला, साजणी सुवासिनीला ।


वायणं वाटलीं सर्वांल । बाळतिणीसंगें बाळराज भूषविला ।


सजवितां पाळणा जिजाईंनीं गाईला । शाहीर ’आत्माराम’ तोच गातो आजला ।


ऐका हो आयाबायांनों, मराठमोळ्यांनो, भारतीयांनो झोंका घातला ॥


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा